कराची – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माकडउड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या जावेद मियांदादने पुन्हा एकदा अभ्यास न करता आणि सत्यता जाणुन न घेता भाताविरुद्ध गरळ ओकली आहे. काश्मीरी जनता आणि मुस्लिमांबद्दल द्वेष पसरविण्याचे काम भारतच करतो. पशुंप्रमाणे माणसांचीही कत्तल करणाऱ्या भारताला लाज वाटली पाहिजे, अशी अचरट दर्पोक्तीही मियांदादने केली आहे.
संघातील हिंदू खेळाडूंना सन्मानाची वागणुक पाकिस्तानी क्रिकेटपटू देत नव्हते असे विधान माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने गुरुवारी केले होते, त्यावर निर्माण झालेले वादळ शमत नाही तोच मियांदादने नेहमीप्रामाणे आपले अगाध ज्ञान पाजळले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय स्तरावर स्वातंत्र्यापासूनच तणावाचे वातावरण राहिलेले आहे. या आगीत पाकिस्तानचे राज्यकर्ते, सेनादलातील हुकुमशहा आणि क्रिकेटपटू यांनी सातत्याने तेल ओतण्याचे काम केले आहे, त्याचीच री ओढत मियांदादने पुन्हा एकदा आपला भारत द्वेष जगजाहीर केला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ला, बालाकोट, सर्जिकल एअर-स्ट्राईक आणि काश्मीरमधून रद्द करण्यात आलेले 370 कलम या विविध बाबींसाठी भारताचा मुस्लिम द्वेष कारणीभुत असल्याचे पाकिस्तानच्या अनेक व्यक्तींनी पसरविले होते. यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच अध्यक्ष इम्रान खान सातत्याने युद्धखोरीची भाषा वापरत आहेत. त्याचे परिणाम सिमेवर देखील तणावाच्या वातावरणावरुन दिसत आहेत. आता सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे भारत आणि पाकिस्तानातील काही प्रसिद्ध व्यक्ती ब्लेमगेम करत आहेत. त्यातच उडी घेत मियांदाद यांनी अनाकलनिय विधाने केली आहेत.
क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांनी भारताचे दौरे रद्द करावेत. भारताला इतर देशांमध्ये क्रिकेट खेळायला जाण्यापासून रोखायला हवे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला एकटे पाडायला पाहिजे. भारतात वर्णभेद सुरू आहे. काश्मीरी जनता आणि मुस्लीम यांच्याबाबत द्वेष पसरवला जात आहे. आपण क्रीडापटूंनीदेखील याला कडाडून विरोध केला पाहिजे. मी सगळ्या देशांना आवाहन करतो की सगळ्यांनी माणुसकीच्या बाजूने उभे रहायला हवे. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध करायला पाहिजे. जगालाही भारताचे वर्तन कसे आहे ते कळु दे, असाही जावईशोध मियांदाद यांनी लावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतही यावर वारंवार चर्चा होते. माणसांची पशूंप्रमाणे कत्तल करणाऱ्या भारताविरोधात सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे अकलेचे तारेही मियांदाद यांनी तोडले आहेत.
माकडउड्यांचा इतिहास
इम्रान खान पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार असताना 1992 साली त्यांनी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यातील साखळी लढतीत भारताने त्यांचा पराभव केला होता. या सामन्यात यष्टीरक्षक किरण मोरे याने वारंवार केलेल्या अपीलवर चिडून मियांदाद यांनी भर मैदानावर माकडउड्या मारल्या होत्या, त्याच माकडचेष्ठांची आठवण या निमित्ताने पुन्हा एकदा यावी अशीच वक्तव्ये त्यांनी आता केली आहेत.