रामदेवबाबा सांगतात त्यानुसार नखावर नखं घासून खरोखर डोक्यावर नव्यानं केस येतात का? की असलेले जातात? या उपायात तथ्यांश आहे, की ही निव्वळ अंधश्रद्धा आहे? अजितदादांनी स्वतःचे विरळ झालेले केस दाखवत याविषयी केलेल्या खुमासदार वक्तव्यामुळे हसू येत असलं, तरी मूळ प्रश्न गंभीर आहे. अनेकदा अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण खूप वरवरची चर्चा करतो किंवा थट्टामस्करी करून थांबतो. परंतु एखाद्या गंभीर घटनेच्या वेळी असे विषय पुन्हा चर्चेत येतात आणि “हे खरं की खोटं,’ या प्रश्नापुढे आपली मजल जात नाही.
तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपाचंच उदाहरण घ्या. अशा नैसर्गिक आपत्तींची सूचना माणसाच्या आधी पशु-पक्ष्यांना मिळते का? हा मुद्दा आता गंभीरपणे चर्चिला जातोय. भूकंपाच्या काही वेळ आधी तिथले पक्षी जोरजोरात आणि विचित्र आवाज करून घिरट्या घालत होते, असा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्याला “नेचर्स अलार्म’ असं शीर्षक दिलंय. पशु-पक्ष्यांना आपत्तींची पूर्वसूचना मिळते, असं मानणाऱ्यांकडे अशा घटनांचा खजिना असतो आणि ज्यांना या भाकडकथा वाटतात, त्यांना “हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही,’ एवढं वाक्य पुरतं. मुख्य म्हणजे, तज्ज्ञांना विचारलं, तर “याविषयी फारसं संशोधन झालेलं नाही,’ असं उत्तर मिळतं. मग खरं-खोटं कसं ठरवणार?
तुर्कीच्या भूकंपापूर्वी किलबिलाट (नव्हे कलकलाट) करणाऱ्या पक्ष्यांचा व्हिडिओ पाहून काहींना 2004 च्या त्सुनामीची आठवण झाली. श्रीलंकेतल्या “याला नॅशनल पार्क’मधले पशु-पक्षी आधीच सावध झाले होते आणि ते उंच ठिकाणी जाऊन बसले होते. त्यामुळे प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होतं, असं सांगितलं गेलं. परंतु तरीही “अधिकृतपणे सांगणं शक्य नाही,’ ही पुस्ती जोडली गेली होतीच. 2009 मध्ये इटलीत जेव्हा भूकंप झाला, त्याच्या आधी बेडकांनी आपली प्रजननस्थळं बदलली होती आणि भूकंपानंतरही अनेक दिवस बेडूक या ठिकाणी फिरकले नव्हते, असं सांगितलं जातं. त्यावेळी काहीजण म्हणाले होते की, भूकंपाच्या आधीच्या रेडिओ लहरी बेडकांना जाणवल्या असाव्यात.
अर्थात, अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे या सरकारी संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्राण्यांच्या वर्तनातील बदलांवरून संकटाचं पूर्वानुमान काढणं शक्य नाही. परंतु असं असलं तरी जगभरात अनेकजण प्राण्यांचं वर्तन आणि नैसर्गिक आपत्ती यांचा संबंध तपासण्याचा प्रयत्न करतायत. नैसर्गिक आपत्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, याविषयी मूलभूत संशोधन होऊन सप्रमाण मांडणी झाली तर ती मानवजातीला हवीच आहे. असं झाल्यास किमान नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तरी माणूस निसर्गाकडे विज्ञान म्हणून बघायचा प्रयत्न करेल.
निसर्गाला आव्हान देण्याचा “मर्दपणा’ आपण खूप दाखवला. जमिनीच्या प्रकाराची, भौगोलिक स्थानाची, वातावरणाची जराही पर्वा न करता आपण डोंगर फोडून रस्ते आणि इतर “विकास’कामं केली. जमिनीला भेगा पडून गावंच्या गावं जेव्हा खचू लागली, तेव्हा आपल्याला जाग आली. खरं तर “कडेलोट’ होण्यापूर्वीच निसर्गानं आपल्याला जागं केलं म्हणून आपण कृतज्ञ असायला हवं. परंतु हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठीही “चॅटबॉट’ची वाट बघणाऱ्या माणसाकडून ही अपेक्षा ठेवणं, हेच निसर्गनियमाचं उल्लंघन ठरेल कदाचित!