मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच आज सकाळी देशमुख यांच्या नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. सीबीआयचे एकूण पाच ते सहा अधिकारी देशमुख यांच्या घरी पोहोचले आहे त्यामुळे देशमुखांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अनिल देशमुख गायब आहेत. ते कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. त्यात आज सकाळी सात वाजता सीबीआयचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झालेले आहे. फक्त देशमुखच नाही तर त्यांच्या कुटुंबियांचाही पत्ता नाही. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसंच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.
याप्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली होती. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.काही महिन्यांपूर्वी सीबीआयने देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजरही राहिले होते.