मुंबई: शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना ईडीकडून चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात येत आहे. मात्र त्यांनी अजूनही हजेरी लावली नाही. यादरम्यानच आता अनिल देशमुख यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे देशात सध्या मुघलांचे राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणं ही यांची संस्कृती नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकात आल्या होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचे राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला.
या देशातील महिला अबला आहे असे त्यांना वाटते. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचे कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी त्यांनी बंदच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारव टीका केली. लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे. माणुसकी राहिली नाही. पूर्वी राजकारणात माणुसकी होती. केंद्राने ही माणुसकी संपवली आहे. शेतकऱ्यांचा खून केला आहे. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे. ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा. यात माणुसकी दिसते. ही क्रूरता आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे, असं सांगतानाच नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.