सातारा : माण मतदारसंघातून ‘आमचं ठरलयं’ या सर्वपक्षीय गटाकडून अनिल देसाई यांचे नाव निश्चित झाले असून. देसाई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, रासप व इतर पक्षाचे नेते या गटाद्वारे एकत्र आले आहेत. परंतु देसाई हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर जयकुमार यांना भाजपचे तिकीट मिळाले तर देसाई अपक्ष लढणारअसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
देसाई या गटाचे उमेदवार निश्चित झाल्याने भाजपचे जयकुमार गोरे, त्या्ंचे बंधू शेखर गोरे व देसाई यांची तिरंगी लढत रंगणार आहे. परिवर्तनासाठी तालुक्यातील सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांतील नेतेमंडळीचे मोठे लॉबिंग सुरू आहे. रणजितसिंह देशमुख यांनी रासपचे सर्वेसर्वा महादेव जाणकार यांचा नागरी स्तकाराचा कार्यक्रम घेऊन मोठी राजकीय खेळी खेळली होती. कारण “एनडीए’तील एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रासपला गेल्या निवडणुकीत भाजपच्या कोट्यातून माणची जागा देण्यात आली होती. त्यावेळी रासपकडून शेखर गोरे रिंगणात होते. त्या निवडणुकीत शेखर गोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची 53 हजार मते मिळाली होती.
मागील निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी यावेळी शेखर गोरे शिवसेनेत असून ते या निवडणुकीतील तगडे उमेदवार समजले जात आहेत. घटक पक्ष असलेल्या रासपला माणची जागा जर भाजपकडून सोडण्यात आली तर मात्र नुकताच प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांची मोठी अडचण होणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्षातील नेतेमंडळी हा मतदारासंघ रासपच्या वाट्याला जाईल, अशी आशा बाळगून आहेत. जयकुमार गोरेंना रोखण्यासाठी मोठे महाभारत सुरू झालेलं पाहायला मिळत आहे.