रेल्वेची ऑनलाईन तिकीट विक्री, पर्यटन आणि केटरिंग सेवा चालवणाऱ्या २० वर्षे जुनी कंपनी ‘आयआरसीटीसी’ चा (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आयपीओ आजपासून खुला होत असून 3 ऑक्टोबरपर्यंत कंपनीच्या समभागांसाठी अर्ज करता येऊ शकतात. 2.01 कोटी समभागांची विक्री करण्यात येणार असून दहा रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरसाठी 315 ते 320 रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. सरकारी उद्योगांचे अंशतः खासगीकरण करून त्यातून महसूल उभा करण्याचा पर्याय सरकारसमोर आला तेव्हा आयआरसीटीसीचे नाव प्रथम पुढे आले.
शेअर बाजाराने उसळी घेतली असल्याने येत्या काळात आणखी काही कंपन्यांचे आयपीओ येऊ शकतात. चालू वर्षात (2019) आतापर्यंत फक्त 11 कंपन्यांनी बाजारात उतरून भांडवल जमवण्याचे धाडस दाखवताना 10,000 कोटी रुपये जमा केले आहेत. 2018 या वर्षात तब्बल 24 कंपन्यांनी 30,959 कोटी रुपये भांडवली बाजारातून उभे केले होते.
आयआरसीटीसी आयपीओची वैशिष्ट्ये
1) संपूर्ण सरकारी मालकी असलेल्या या कंपनीचे प्रशासकीय नियंत्रण भारतीय रेल्वेकडे आहे. आयपीओतून जमा झालेल्या रकमेचा आयआरसीटीसीला उपयोग करता येणार नसून सरकारने स्वतःच्या मालकीचा 12.5 टक्के हिस्सा विक्रीला काढला आहे. या विक्रीनंतर कंपनीमध्ये सरकारचा हिस्सा 87.5 टक्के राहणार आहे.
2) रेल्वेच्या आरआयटीईएस (राईटस्), रेल विकास निगम आणि आयआरसीओएन (इरकॉन) या कंपन्यांच्या नंतर आता चौथ्या कंपनीची भागविक्री होत आहे.
3) गुंतवणूकदारांना किमान 40 शेअरची किंवा त्यापटीत खरेदी करता येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 7,000,000 शेअर राखून ठेवण्यात आले आहेत.
4) किरकोळ गुंतवणूकदारांना आणि कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना समभाग खरेदीत 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांसाठी 1,60,000 शेअर राखून ठेवण्यात आले आहेत.
5) सध्या रेल्वेची ऑनलाईन तिकीटविक्री, केटरिंग आणि बाटलीबंद पाणी पुरवण्याच्या सेवेत आयआरसीटीसीची मक्तेदारी आहे.तिच्या वेबसाईटवर दर महिन्याला विक्रमी सरासरी १.५ कोटी ते १.८ कोटी व्यवहार होतात. त्यामुळेच ती आज जगातील आशिया पॅसिफिक या विभागात सर्वाधिक व्यवहार करणाऱ्या मोजक्या वेबसाईटसपैकी एक ठरली आहे. म्हणूनच आज ती नफ्यातील (२७२ कोटी रुपये) ‘मिनीरत्न’ सरकारी कंपनी आहे.
6) असे असले तरी आयआरसीटीसीच्या मालकीचा मोठा हिस्सा सरकारकडे असल्याने रेल्वे मंत्रालयाच्या धोरणांचा कंपनीच्या व्यावसायिक निर्णयावर आणि महसूलावर परिणाम होत राहणार आहे.
7) रेल्वेचे खासगीकरण आणि काही रेल्वेगाड्या चालवण्यास देण्याचे धोरण सरकारने आखले असून त्याअंतर्गत 5 ऑक्टोबर पासून दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस चालवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीला मिळालेली आहे. भविष्यात आणखी काही गाड्या चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यावेळी मात्र आयआरसीटीसीला अन्य खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागू शकते.
8) 2019 या आर्थिक वर्षात आयआरसीटीसीच्या विक्रीत आधीच्या वर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1,957 कोटी रुपयांवर पोचली तर नफ्यात 13.5 टक्क्यांची वाढ होऊन तो 272 कोटी रुपयांवर पोचला आहे.