मुंबई – अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यावेळी भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात मुख्य लढत होतेय. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी दाखल केला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 17 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून भाजप उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन लटके यांना बिनविरोध करावे अशी विनंती केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले की, आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली. त्याठिकाणी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खकरोखर शांती मिळेल…
माझी विनंती आहे की भाजपने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणुक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं माझं मन सांगते. असं करण हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. , असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
दरम्यान, या पत्रावर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हंटले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे समर्थन करण्याची विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिले आहे की, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा. पण भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, त्यांच्या पत्रावर विचार कण्यासाठी मला सहकाऱ्यांशी आणि पक्षात चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि अर्ज देखील दाखल केला आहे. आम्हाला याआधी जेव्हा योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तेव्हा अशी भूमिका घेतली होती.
आरआर पाटील यांच्या वेळी तशी भूमिका घेतली होती. आता विधानपरिषदेच्या दोन जागांसाठीही घेतली होती. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागले. सगळी चर्चा झाल्यानंतरच यापत्राबाबत प्रतिक्रिया देता येईल. त्यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवलेले आहे. आम्ही जरूर याचा गांभीर्याने विचार करू. पण सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी याआधी काही वेळी ज्या ठिकाणी एखाद्या आमदाराचे निधन झाल्यास आणि पोटनिवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्ती उभा असल्यास भाजपने उमेदवार मागे घेतला असल्याचे म्हंटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील तो एक अलिखित नियम असल्याचेही सांगितले जाते. त्यातच राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी भाजपने उमेदवार देऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेण्याचा विचार केल्यास मुरजी पटेल यांचे आमदार होण्याचे स्वप्न अधुरेच राहणार की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्याची ही दुसरी वेळ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी आताचे उमेदवार ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.