मुंबई – आव आणणारे काही जण, डोळे वटारल्यावर पळून गेले, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मुंबईत पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.
यावेळी पेण, सुधागड, रोहा विधानसभा मदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांचे मातोश्रीमध्ये स्वागत आहे. मला एका गोष्टीचे नक्की समाधान आणि अभिमान आहे. आज पक्ष प्रवेश केलेला आहे. तुम्ही लढवय्यांच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अन्यायविरूद्ध लढणाऱ्यांच्या सेनेत प्रवेश केलेला आहे. काही जण आपण बघितले की, आव मोठा होता.
पण जरा डोळे वटारल्यावर पळून गेले. शेवटी अन्यायावरती वार करणे, ही आपली ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही आणि अन्याय करायचा नाही. पण कोणी अन्याय केला, तर अन्याय करणाऱ्याला जागेवर ठेवायचे नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हिंगोलीत रविवारी होणार सभा
उद्धव ठाकरेंनी उन्हाळ्यामुळे सभा थांबविल्या होत्या. येत्या 27 तारखेला हिंगोलीला सभा घेणार आहे. पेणमध्ये कधी सभा घ्यायची हे तुम्ही ठरवा, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तुम्ही जो भगवा हातात धरलेला आहे तो मात्र कोणी कितीही प्रयत्न केला तरी हातातून सुटू देऊ नका. भगवा तुमच्या हातातून सुटणार नाही, अशी अपेक्षा करतो,असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले.