नवी दिल्ली :- नितीशकुमार देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्ने पहात आहेत; पण त्यांना त्यांच्याच राज्यात गुन्हेगारीवर अंकुश ठेवता येत नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असताना, असा माणूस पंतप्रधान कसा काय बनू शकतो, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे.
बिहारमधील नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून भारतीय जनता पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी नितीश कुमार यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्याच्या संदर्भात, प्रसाद यांनी विचारले की हे खरोखरच माजी पंतप्रधानांवरील त्यांच्या प्रेमाचे प्रदर्शन होते की, ते त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना काहीतरी दाखवायचे होते?
प्रसाद पुढे म्हणाले, नितीशबाबू, तुम्हाला काय झाले आहे? काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये एका पोलिसाची हत्या झाली होती. त्यानंतर एका पत्रकाराची हत्या झाली. गयामध्ये वाळू माफियांनी पोलिसांवर हल्ला केल्याची बातमी आज आली आहे. नितीशबाबू, तुम्हाला बिहार सांभाळता येत नाही. बिहारची काळजी घ्या आणि देशाची चिंता सोडा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे.
जेडीयूचा मित्रपक्ष आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) चा संदर्भ देत प्रसाद म्हणाले, बिहारमध्ये दहशत आहे. वाळू माफियांमुळे लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. ज्यांच्या बरोबरीने तुम्ही सरकार स्थापन केले आहे, त्या लोकांचे गुन्हेगारांना पूर्ण संरक्षण आहे.