मुंबई – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा परिसरातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. धंगेकर यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे.
दरम्यान, कसब्यातील निकालाबाबत आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘कसब्यात झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केले जात आहे. कसबा हा भाजपचा मतदारसंघ आहे. कसबा पेठ, सदाशिवपेठ नारायण पेठ या भागात वर्षानुवर्ष भाजपला मतदान होत होतं.
यावेळी भाजपला या भागात मतदान झालं नाही हा चेंज दिसतो. त्यामुळे राज्यकर्त्यांविरोधात नाराजी असल्याचं दिसून येतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार भाजपचं टेन्शन वाढवून त्यांना डिवचत तर नाही ना? अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.