औंध – पाषाण येथील नागरिकांशी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पोलीस गस्त वाढविणे, योग अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे यासह अन्य समस्यांचा पाढाच नागरिकांनी वाचून दाखविला, त्यावेळी डोक्याला हात लावत पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकारी करतात काय? असा प्रश्न करीत संबंधीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सर्व समस्या तातडीने सोडविण्याच्या कडक सूचना केल्या.
पाषाण परिसरात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर पाटील यांनी थेट अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून योग्य ती सूचना केली. तसेच परिसरात चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
बाणेर-बालेवाडीप्रमाणेच पाषाणमधील नागरिकांनाही सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी थेट भेट उपक्रमातून दिली.
यावेळी भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहूल कोकाटे, सनी निम्हण, प्रकाश तात्या बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, सचिन मानवतकर, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, चद्रकांत दादा पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केल्याबाबत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महामार्गालगत काहीजण राडारोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.