मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआच्या वज्रमूठ सभेमध्ये अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे विरोधकांकडून या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष करत शिंदे गटावरही निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढच्या भाषणात फडणवीसांच नाव घेऊन भाषण करतो, असे म्हटल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार यांनी सभेदरम्यानच्या विविध घटनेवर भाष्य केले. दरम्यान, एका पत्रकार महिलेने सभेवेळी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली पण यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं नावही घेतलं नाही. असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी, पुढच्या भाषणात फडणवीसांच नाव घेऊन भाषण करतो. तुमची सूचना अजित पवारांनी स्विकारली आहे. असं ठोसपणे अजित पवारांनी उत्तर दिल. त्याचे पडसाद उद्याच्या नागपूरच्या जाहीर सभेत उमटतील, असे म्हटले.
छत्रपती संभाजीनगरमधील मविआच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यामुळं राज्याच्या राजकारणात भलतीच चर्चा रंगली होती, माध्यमांनी देखील याबाबत बातम्या चालवल्या. यावरही अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
गेल्या काळात उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळं आजही ते ताठ बसता येईल अशी खुर्ची वापरतात. त्यामुळं सभेच्या ठिकाणी देखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. बाजूला दोघांसाठी सोफ्याच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यामुळं यामध्ये खुर्चीबाबत भेदभाव केलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी या वादावर दिले आहे.