मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयु) विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला. यावेळी आव्हाड काही वेळ विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसले होते.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. आज सकाळीही विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आव्हाड यांनी जेएनयूतल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सरकार कोणतंही असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाण चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले.
जेएनयू विद्यार्थ्यांच्या हुशारीला सरकार घाबरते. जेव्हा अशा विद्यार्थ्यांवर हल्ला होतो तेव्हा अराजकता आली आहे, असेच म्हणावे लागेल. जेएनयूमध्ये झालेली घटना लाजिरवाणी असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. आपणही विद्यार्थी चळवळीतून आलो आहोत, माणुसकी हा माझा धर्म असून तो पाळण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. हा हल्ला डाव्या संघटनांनी केला असल्याच्या आरोपाची आव्हाड यांनी खिल्ली उडवली. दरोडेखोराने उलट्या बोंबा मारण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.