केरळ : फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्याने एका हत्तीणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना केरळमध्ये घडली आहे. एवढेच नाही तर, येत्या काही महिन्यातच ती पिल्लाला जन्म देखील देणार होती. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध तसेच हळहळ व्यक्त केली जात आहे.
खाण्याच्या शोधात आलेल्या हत्तीणीला कोणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. झालेल्या दुखापतीमुळे ती पाण्याच्या शोधात वेल्लीयार नदीच्या मधोमध जाऊन उभी राहिली. ती 3 दिवस नदीत सोंड आणि तोंड बुडवून उभी होती. तिच्या जबड्याच्या दोन्ही बाजूंना गंभीर जखमा झालेल्या होत्या.
रॅपिड रिस्पॉन्स टीमचे वनाधिकारी मोहन कृष्णन यांनी या घटनेबद्दल फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहित म्हटले की, आम्ही तिला बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि दोन प्रशिक्षित हत्ती बोलावले परंतु ती तिथेच उभी राहिली जागची हलली नाही त्यामुळे आम्ही ऑपरेशनची तयारी करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम केल्यानंतर ती गर्भार असल्याचं समजलं.
याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनचा शोध सुरू आहे परंतु अशा या दुःखद घटनेने माणूस आणि माणुसकी यावर प्राण्यांनी कसा विश्वास ठेवायचा हाचं प्रश्न उभा आहे.