पिंपरी: तीन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे घडली. राजू गोपाळ जानराव (वय 36, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. रफीक अमीर मनेर (वय 45, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू जानराव हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्या सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी ते तीन तरुण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते. मात्र तो सुरक्षा रक्षक मिळाला नाही म्हणून हल्लेखोर तरुणांनी जानराव याच्याशी हुज्जत घातली.
त्यानंतर जानराव यास स्मशानभूमीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी जानराव आपल्या घराकडे म्हणजे लालटोपीनगरकडे पळाला. मात्र लालटोपीनगरच्या बाहेर पुन्हा जानराव याला गाठून लाकडी फळीने डोक्यात मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या जानराव याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून लवकरच त्यांना अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या घटनेत एकाचा नाहक जीव गेल्याने लालटोपीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.