मुंबई :महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अ ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानाच्या विरोधात राज्यभरात भाजपकडून आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान,भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलं.
अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना “छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या, त्या भाषांची नावं सांगावीत,” असा सवाल केला आहे. तसेच अजित पवारांच्या विधानाचं समर्थन करताना अमोल मिटकरी म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने वसलेल्या संभाजीनगरमध्ये काल जे पी नड्डा आले होते. यावेळी ते चक्क बाळासाहेब ठाकरेंचं नाव विसरले. ते बाळासाहेब ठाकरेंऐवजी बाळासाहेब देवरा म्हणाले. इतकंच नाही तर, त्यांनी ‘छत्रपती की जय’ अशा घोषणा दिल्या. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं औदार्यही त्यांनी दाखवलं नाही.” अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
“आज आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या वल्गना करत आहेत. माझं बावनकुळेंना खुलं आव्हान आहे, छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या? आणि त्या भाषांची नावं बावनकुळेंनी सांगावीत… यासाठी माझं त्यांना खुलं आव्हान आहे. तसेच धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक यातील फरक तुम्ही आम्हाला शिकवू नये,” असा टोलाही मिटकरींनी लगावला.
तसेच केंद्रात आणि राज्यात तुघलकी सरकार आहे. सत्तेत बसलेले औरंगजेबाचे वारस आहेत. त्यामुळे जनता लवकरच यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असंही मिटकरी म्हणाले.