Dr.Amol Kolhe : संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) यांचाही समावेश आहे. या लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) यांनी ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. आपल्या पोस्ट मधून अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या… pic.twitter.com/CsNUO5QCPO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023
अमोल कोल्हे म्हणतात की, “कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
आणीबाणीबद्दल आजपर्यंत केवळ ऐकून होतो, आज या निलंबनाच्या निमित्ताने अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली. सरकारला केवळ “मन की बात” करायची आहे, “जन की बात” ऐकायचीच नाही हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. सरकारची हीच भूमिका असेल तर आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल. रणांगणातील युद्धात आमचा इतिहास सर्वश्रुत आहे, याची नोंद सरकारने घ्यावी ! असं कोल्हे आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले आहेत.
निलंबित करण्याचं कारण काय?
13 डिसेंबरला चार जणांनी संसद परिसरात जात धुमाकूळ घातला. यातील दोन तरूणांनी लोकसभेत जात प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात. त्या बाकांवर उडी मारली. या दोघांनी लोकसभेत धुडगूस घातला. या तरूणांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा धूर निघाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी चौकशी केली जावी आणि सरकारच्या बाजूने ऑफिशिअल स्टेटमेंट समोर यावं, यासाठी संसदेत विरोधक आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे मागच्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केलं जात आहे.