अरुणाचल प्रदेश – भारताविरोधात कटकारस्थान करण्याची संधी चीन कधीच सोडत नाही. अजूनही चीनच्या भारताविरोधी कुरापती चालूच आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशच्या हद्दीतील काही ठिकाणांची नावं बदलली. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उमटली. सध्या हे प्रकरण जगभरात चर्चेत आले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात ‘कोणीही भारताच्या सीमेकडे डोळे वर करून पाहू शकत नाही,’ असा इशारा दिला. गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता.
अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा बिजिंगमध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं माध्यमांना केला होता. यामुळे त्या भागात भारताचा कोणताही अधिकारी किंवा नेत्याने दौरा करणे हे त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्यासारखे आहे. अमित शहांचा दौरा सीमाभागातील शांततेसाठी अनुकूल नाही. आमचा याला कडाडून विरोध असल्याचे चिनी प्रवक्त्यानं माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
अमित शहा यांनी “सैनिकांच्या पराक्रमामुळे आमची भूमी सुरक्षित आहे. तो काळ गेला जेव्हा कोणीही आमची जमीन काबीज करू शकत होता, पण आता सुईच्या टोकाएवढीही जमीन कुणी घेऊ शकणार नाही. संपूर्ण देश आज आपापल्या घरात सुखानं झोप घेत आहे. कारण आमचे आयटीबीपीचे जवान आणि सेना आमच्या सीमारेषांवर दिवसरात्र तैनात आहेत. त्यामुळे वाईट नजर टाकण्याची कुणाचीच हिंमत नाही,” अशा शब्दात चीनला खडसावले होते.
दरम्यान, चीनने भारतीय सीमेवर अलीकडच्या काळात जी काही उपाययोजना केली आहे ती धोकादायक आहे. आतापर्यंत चीनने अरूणाचल प्रदेशमधील विविध भागांची नावे बदलून हा भाग आता आपल्या हद्दीत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग असून तो नैसर्गिकदृष्ट्या चीनचाच भाग असल्याचा त्यांचा खूप पूर्वीपासूनचा दावा आहे. यापूर्वी देखील चीनने अरुणाचलमधील काही ठिकाणांची नावे बदलली होती.