काबुल – अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याने अन्य देशांप्रमाणेच भारतानेही कंदहार दूतावासातील आपले सर्व कर्मचारी हलवले आहेत. हवाईदलाच्या विशेष विमानाने या दूतावासातील सुमारे 50 भारतीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना तेथून दिल्लीला आणण्यात आले आहे.
कंदहारजवळ तालिबानी गनिम आणि तेथील लष्कराच्या फौजा यांच्यात जोरदार रणकंदन माजले आहे. तालिबानने बऱ्याच भागाचा ताबा घेतला असून, त्यांचा आता कंदहारवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या चकमकीचे वृत्त ऐकल्यानंतर भारतीय दूतावास तातडीने रिकामा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला त्यानुसार या कर्मचाऱ्यांना तेथून हलवण्यात आले आहे.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगाणिस्तानातील स्थितीवर आम्ही सतत लक्ष ठेऊन आहोत. तेथील भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हा आमच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले. भारताने कंदहारचा दूतावास बंद केलेला नाही. फक्त आम्ही त्या ठिकाणची स्थिती पाहून आमचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात हलवले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेरात आणि जलालाबाद येथील भारतीय दूतावास गेल्याच वर्षी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानातील भारतीय दूताने भारताचे पराराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना त्या देशातील एकूण स्थितीविषयी माहिती दिली. अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती धोकादायक बनली असून, येथील भारतीय नागरिकांवर हत्या आणि अपहरणाचा धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.