नवी दिल्ली : सध्या भारतात बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे इथल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनी देशातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनी सध्या छाटणीच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे. या छाटणीचा फटका अॅमेझॉन वेब सर्विसेस आणि ह्युमन रिसोर्सेस टीमला बसला आहे.
अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी मार्चच्या अखेरीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. याचा परिणाम कंपनीच्या जगभरातील 9000 कर्मचाऱ्यांवर झाला आहे. क्लाऊड सर्विसेस, अॅडव्हर्टायझिंग आणि ट्वीटेट युनिट्समधील सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. स्टाफला मेमोद्वारे याची माहिती देण्यात आली होती.
कोची आणि लखनौमध्ये कंपनीचे सेलर ऑनबोर्डिंग फंक्शन बंद करण्यात आलं आहे. अॅमेझॉनच्या सूत्रांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेझॉनने अलिकडच्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सांगितलं होतं की सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येईल.
अॅमेझॉन आपल्या जागतिक योजनेअंतर्गत भारतातून अनेक कर्मचाऱ्यांची कपात करेल असं नोव्हेंबर 2022 मध्ये म्हटलं होतं. मागील काही वर्षात कंपनीने जास्त लोकांना कामावर ठेवलं होतं आणि आता अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेमुळे खर्च करण्यासाठी कंपनीने आणखी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं अॅमेझॉनच्या सीईओंनी सांगितलं होतं.
अॅमेझॉन कंपनीमध्ये अजूनही वाढ होत आहे. कंपनीच्या सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक असलेला अपेरिओ (Appario) भारतातील नियमांचे पालन करण्यासाठी नवीन विक्रेत्याकडे इन्व्हेंटरी हस्तांतरित करत आहे. दरम्यान, मागील वर्षी अॅमेझॉनने भारतातील अन्न, वितरण, अॅडटेक आणि घाऊक वितरणासह अनेक व्यवसाय बंद केले होते.