“इंडिया’ आघाडीत केवळ आपल्या स्वार्थासाठी विरोधी पक्ष एकत्र आल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या आघाडीतील पक्ष हे घराणेशाही पोसतात आणि भ्रष्टाचारावरच तिचे पालनपोषण होते, असा हल्लाबोल त्यांनी केला होता. मोदी यांनी त्यानंतर भाजपप्रणीत एनडीए आघाडीतील सर्व पक्षांची एक बैठक घेऊन त्यांच्या नेत्यांशी व्यक्तिगत संवाद साधला.
उत्तर प्रदेश, बिहारमधील चिल्लर पक्षांचे नेते तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार बैठकीस हजर होते. स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या पक्षाचेही दोन तुकडे पडले असून, त्यापैकी एका गटाचे नेते चिराग पासवान यांना त्यावेळी मोदी यांनी प्रेमभराने जवळ घेतले आणि शिंदे व अजित पवार यांच्याशीही सुसंवाद साधला. गेल्या महिन्यापासून मोदी एनडीएमधील 40-45 खासदारांच्या स्वतंत्र बैठका घेत आहेत.
भाजपमधील खासदारांनी फक्त राममंदिर या एकाच मुद्द्यावर विसंबून न राहता, आपापल्या मतदारसंघांत जाऊन प्रत्यक्ष काम केले पाहिजे, अशी सूचना मोदी यांनी केली. थोडक्यात, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करणे, खासदारांना प्रोत्साहित करणे तसेच एनडीए आघाडीतील पक्षांशी घट्ट संबंध प्रस्थापित करणे यावर भाजप पक्षनेतृत्वाने भर दिला आहे. “इंडिया’ आघाडी परिणामकारक ठरली, तर भाजपच्या जागा कमी होतील, हे लक्षात घेऊनच एरवी घटकपक्षांची उपेक्षा करणाऱ्या भाजपने त्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाटकात भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या “धर्मनिरपेक्ष जनता दला’पुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, गणेशोत्सवानंतर उभय पक्षांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर, तमिळनाडूतील वास्तव मात्र भाजपच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे दिसत नाही. गेली काही वर्षे तमिळनाडूत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही भाजपच्या हातात फारसे काही लागलेले नाही. अण्णाद्रमुक हा भाजपचा तेथील मित्रपक्ष आहे.
तमिळनाडूचे एक मंत्री स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबद्दल काढलेल्या उद्गारामुळे देशभर वादळ निर्माण झाले असून, भाजप त्याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवत आहे. द्रमुकचे संस्थापक आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सीएन अण्णादुराई यांनी 1956 साली मदुराई येथील एका कार्यक्रमात हिंदू धर्माचा अवमान केला होता, अशी टीका नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नमलई यांनी केली आहे. त्या काळी मीनाक्षी मंदिरात झालेल्या एका परिषदेत अण्णादुराई यांनी हे उद्गार काढल्यानंतर त्यांना लपावे लागले होते आणि माफी मागितल्यानंतरच ते सुरक्षितपणे वावरू शकले होते. उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या टिप्पणीनंतर तमिळनाडूत 11 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलने करण्यात आली होती, त्यावेळी अन्नमलई यांनी ही माहिती दिली. मात्र, यामुळे अण्णाद्रमुकने सोमवारी भाजपबरोबर असलेली युती संपुष्टात आल्याची एकतर्फी घोषणा करून टाकली.
स्वतःचे प्रस्थ वाढवण्यासाठी अन्नमलई हे द्रविडजनांचे आदर्श असलेल्या अण्णादुराई, ई. व्ही. रामस्वामी पेरियार, माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन व जयललिता यांच्याबाबत सातत्याने आक्षेपार्ह विधाने करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच अण्णाद्रमुकने दिला आहे. तर पक्ष वाढत नाही हे अण्णाद्रमुकचे खरे दुखणे असून अन्नमलई यांच्यासारखे तरुण नेते पुढे येत असल्यामुळे, त्या पक्षाचे माथे फिरले आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
काही दिवसांपूर्वी अण्णाद्रमुकचे सरचिटणीस व माजी मुख्यमंत्री इडापल्ली के. पलानीस्वामी यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. अन्नमलई यांना आवर घाला, अशी विनंतीही त्यांनी तेव्हा केली असल्याचे सांगण्यात येते. तमिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा असून, शेजारच्या पुद्दुचेरीत एक जागा आहे. अन्नमलई यांना अण्णाद्रमुकबरोबर युती नको आहे, अशी चर्चा गेले बरेच महिने सुरू आहे. एक लक्षात घेतले पहिजे की, यापूर्वी भाजपने जरी कधी द्रमुकशी तर कधी अण्णाद्रमुकशी आघाडी केली असली, तरी उभयतांच्या विचारसरणींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
द्रविड जनतेच्या उन्नतीसाठी स्थापन केलेला महासंघ, असा अर्थ असलेल्या द्रमुकचा (द्रविड मुन्नेत्र कळघम) जन्म स्वतंत्र भारतात सप्टेंबर 1949 मध्ये झाला. पण त्याची मुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील जस्टिस पार्टीत रुजलेली होती. काही उच्चवर्गीय उदारमतवाद्यांनी 1916 साली जस्टिस पार्टीची स्थापना केली होती. आपण ब्राह्मणेतर आहोत, असे सांगण्यात अभिमान वाटणाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे ती स्थापन झाली होती.
द्रविड लोक हे भारताचे मूळ रहिवासी असून, इसवी सनपूर्व 2000 मध्ये मध्य आशियातून आलेल्या आर्यांनी भारतावर आक्रमण करून, द्रविडांना पराभूत करून हा देश बळकावला आहे. वैदिक धर्म हा आर्यांनी लादलेला असून, त्यानुसार ब्राह्मण हे सर्वोच्च स्थानी व हद्दपार झालेले द्रविड लोक सर्वात खालच्या स्तरावर, म्हणजे शूद्र आहेत, हा तो सिद्धांत. ईव्ही रामस्वामी नायकर ऊर्फ पेरियार यांनी तर जातिभेद व पुरोहितशाहीचे उच्चाटन करण्यासाठी “स्वाभिमान’ चळवळ सुरू केली.
पेरियार यांनी अण्णादुराई यांना राजकारणात आणले. अण्णांनी मात्र त्यानंतर स्वतंत्रपणे “द्रविड मुन्नेत्र कळघम’ची स्थापना केली आणि पेरियारांची निरीश्वरवादी भूमिका नाकारली; परंतु तरीदेखील शेवटी अण्णाद्रमुकचा डीएनए हा भाजपपेक्षा खूपच वेगळा आहे. तमिळनाडूतील प्रादेशिक पक्ष हे आरक्षणाचे व गोरगरिबांचे राजकारण करतात आणि हिंदीची व उत्तर भारतीयांची दादागिरी त्यांना सहन होत नाही. मात्र, उद्या तमिळनाडूतील एक महत्त्वाचा मित्रपक्ष गमावल्यास, भाजपला अर्थातच फटका बसणार आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला तमिळनाडूत 15 जागा हव्या आहेत. मागच्या वेळी युतीमध्ये भाजपला पाचच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे दबावतंत्र म्हणून अन्नमलई हे अण्णाद्रमुकवर टीका करत असल्याची शक्यता आहे. परंतु शेवटी दाती तृण धरून उभयतांना एकत्र यावेच लागेल, अशीच चिन्हे आहेत.