मुंबई: आत्तापर्यंतमहाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यात अनेक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. आता कयार पाठोपाठ ‘महा’ चक्रीवादळचाही धोका निर्माण झाला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून सतर्कतेचा इशारा वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता पुढील ४८ तासांत आणखी वाढण्याची शक्यता असून, उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
तसेच समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मच्छीमाराना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छीमाराना परत बोलावण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पत्रक काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील. येत्या ४८ तासांत कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.