भारताच्या विविध प्रांतात हा उत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो. राजस्थानात या दिवसाला आखा तिज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह संपन्न करण्याची पद्धती आहे. तसेच पश्चिम बंगालमधील काही प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने गणपती आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.
ओरिसामध्ये अक्षय्यतृतीयेचा जगन्नाथाच्या इतिहास व परंपरेशी संबंध आहे. या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
उत्तर भारतात काही वेगळ्या परंपरा आहेत. या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. तर दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू व केरळातही अक्षय्यतृतीया विविध परंपरेतून साजरी केली जाते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. कर्नाटकात उगादी या नावाने हा सण साजरा केला जातो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय जीवनातील अपूर्व व अद्भूत असा सांस्कृतिक परंपरेचा सुवर्णधागा अक्षय्यतृतीयेच्या उत्सवाने जोडलेला आहे.
अक्षय्य पात्र
दक्षिणेत या दिवसासंबंधी काही वेगळ्या कथा सांगितल्या जातात. तेथील मान्यतांनुसार, देवांचे खजिनदार कुबेर यांनी शिवपुरम येथे शंकराची आराधना करून या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने कुबेराला वरदान मागण्यास सांगितले. आपले धन आणि संपत्ती लक्ष्मीकडून आपणास परत मिळावी, असे वरदान कुबेराने मागितले, तेव्हा शंकराने कुबेराला श्रीलक्ष्मीची आराधना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून आजअखेर दरवर्षी अक्षय्यतृतीयेला श्रीलक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजागृहात श्रीविष्णू, श्रीलक्ष्मी यांच्यासमवेत श्रीकुबेराचेही चित्र लावले जाते. याच दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला “अक्षय्य पात्र’ मिळाले होते. या पात्राचे वैशिष्ट्य असे की, यातील भोजन कधीही संपत नसे. या पात्राच्या साह्याने युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरिबांना आणि भुकेल्या लोकांना भोजन देऊन मदत करीत असे. त्यामुळेच या दिवशी केला जाणारा दानधर्म महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी केलेल्या पुण्याचे फळ कधीच न संपणारे असते, असे मानले जाते. दानशूर माणसाचे भाग्य या दिवशी केलेल्या दानामुळे वर्षानुवर्षे वाढतच राहते.
महाभारतातील कथा
महाभारतात अक्षय्यतृतीयेसंबंधी आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. दुःशासनाने याच दिवशी द्रौपदीचे वस्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला कधीही न संपणारे वस्त्र प्रदान केले होते. अक्षय्यतृतीयेसंबंधी हिंदू समाजात आणखी एक रोचक कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाने पृथ्वीवर अवतार घेतल्यानंतर त्याला सुदामा नावाचा गरीब मित्र मिळाला. हा मित्र श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच आला होता. श्रीकृष्णाला भेट देण्यासाठी सुदामाकडे केवळ थोडेसे पोहे होते. ते त्याने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. परंतु आपल्या मित्राबरोबरच सर्वांचे मन जाणणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या मित्राच्या म्हणजे सुदामाच्या झोपडीचे रूपांतर महालात केले. त्याला सर्व सुविधा प्रदान केल्या. त्यामुळेही या दिवशी केल्या गेलेल्या दानाला महत्त्व प्राप्त झाले.