मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घाटकोपरमध्ये एकदिवसीय शिबीर शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. छगन भुजबळ यांनी “मुंबई महानगरपालिकेमधील सत्तेचे राजकारण, अर्थकारण, उदात्तीकरण- शासनाचा हस्तक्षेप” या विषयावर मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी विविध मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला.
“मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाची शासकीय कार्यालये, संस्था आणि उद्योग बाहेर नेले जात आहेत. लाखो तरुणांचा रोजगार गेला पण राज्य सरकार काही बोलायला तयार नाही. बोललं तर ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही,” अशी टीका छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केली आहे.
त्यानंतर त्यांनी खारघर प्रकरणावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “उन्हातान्हात निष्पाप लोकांचा बळी गेला. भारतरत्नसारखा पुरस्कारही दिल्लीच्या भवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिला जातो. मग महाराष्ट्र भूषणच्या या कार्यक्रमातून कोणाची ताकद दाखवायची होती. या सरकारला आपल्या पाठीमागे किती लोक आहेत, हे दिल्लीवाल्यांना दाखवायचं होतं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंबईच्या प्रश्नावर बोलताना अठरापगड जातींना विसरता कामा नये. ओबीसी, एससी, एसटी या सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. पक्षाच्या कार्यालयापेक्षा लोकांमध्ये मिसळणे जास्त गरजेचे आहे. निवडणुका कधीही लागतील. अडचणी खूप येतील. तुम्ही जर मजबूत असाल तर यश तुमच्या पाठीमागे येईल. कोण आपल्याबरोबर आहे किंवा नाही हे महत्वाचे नाही. आपण आपल्या ताकदीवर उभे राहायला पाहिजे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण राहू शकतो.
तसेच त्यांनी मुंबईतील वाढते काँक्रिटीकरण व प्रदूषणाच्या प्रश्नाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “महापालिका निवडणुकीत लोकांसोबत लहान-लहान गोष्टींमधून जोडले गेले पाहिजे. लोकांचे स्थानिक प्रश्न, रुशाळांमधील प्रवेश, रुग्णालयात भरती करणे, पोलिस त्रास देत असतील तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. वॉटर, मीटर आणि गटार या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. राजकारणावर कितीही बोलले तरी जोपर्यंत तुम्ही लोकांशी जोडले जात नाही, तोपर्यंत निवडणुकीत अडचणी निर्माण होत राहतील, असेही सल्ला भुजबळ यांनी दिला.