अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूतापैकी एक महत्त्वाचा सण आहे. शास्त्रात या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त आणि उगादी तिथी असेही म्हटले आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही, या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय म्हणजेच क्षय न होणारे फळ देते म्हणून या तिथीला अक्षय्यतृतीया असे म्हटले जाते. त्यामुळेच लोक या दिवशी सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी खरेदी करतात.
अक्षय्यतृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी देखील एक शुभ दिवस आहे. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंतीही असते. यावेळची 22 एप्रिलला येणारी अक्षय्यतृतीया अनेक शुभ संयोग घडत साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.
काय आहेत हे शुभ संयोग?
यंदाच्या अक्षय्यतृतीयेच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत उच्च असेल. तसेच सूर्य अधीस्वामी असलेल्या कृतिका नक्षत्रात राहील. याशिवाय अमृत सिद्धी योग, रवि योग, सर्वार्थ उजीयोग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग देखील यंदाच्या अक्षय्यतृतीयेच्या दिवशी तयार होत आहेत. अशाप्रकारे अनेक शुभ योग एकत्र आलेल्या महायोगात केलेल्या उपासना, केलेली शुभकार्ये, खरेदी वगैरे अधिक फलदायी ठरणार आहेत.
यंदाच्या अक्षय्यतृतीया पूजेचा शुभ मुहूर्त शनिवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी समजून आहे. आपल्या प्रत्येक सणामागे निसर्ग संरक्षण, आरोग्य रक्षण, चांगल्या सवयी लागाव्या असे काहीतरी उद्देश लपलेले असतात.
अक्षय्यतृतीयेला नवीन मातीच्या भांड्याची पूजा करून त्यात पिण्यासाठी पाणी भरण्याची प्राचीन परंपरा आहे. अक्षय्यतृतीयेचा सण वैशाख महिन्यातील उन्हाळा तीव्र होण्याच्या सुमारास येतो. माठातील थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आराम मिळतो. आजकाल उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी रेफ्रिजरेटरची सोय असली तरी अनेकजण उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीची भांडी वापरणे सोयीचे मानतात. शास्त्रकारांनी याला धार्मिक स्वरूप दिले होते. शास्त्रानुसार घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी, कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते. कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते, त्या घरात सुख-समृद्धी आणि शांती सदैव राहते. त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचे रूप मानले जाते. या समजुतींमुळे, उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पाणी पिणार्यासाठी अमृतासारखे कार्य करते अशी समजूत आहे.
गरीब मित्र सुदामा आणि एक राजा असलेल्या श्रीकृष्ण यांच्या मित्र प्रेमाची पौराणिक कथा सगळ्यांच्या परिचयाची आहे. या भेटीनंतर सुदाम्याचे दारिद्य्र संपून त्याला ऐश्वर्य प्राप्त झाले. तो दिवस अक्षय्यतृतीयेचा होता. तेव्हापासून अक्षय्यतृतीयेचा दिवस हा संपत्ती, सुख आणि समृद्धीच्या रुपात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. आहेरेवाल्यांनी नाहिरेवाल्यांना मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. दान दिल्याने याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते. संस्कृतमध्ये दानासंबंधी अनेक सुंदर सुभाषिते आहेत.
दानेन तुल्यो विधिरस्ति नान्यः।
लोभाच्च नान्यो।स्ति रिपु: पृथिव्याम्।।
विभूषणं शीलसमं न चान्यत्।
संतोषं तुल्यं धनमस्ति नान्यत्।।
दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही. लोभासारखा दुसरा शत्रू नाही. चारित्र्यासारखा दुसरा उत्कृष्ट अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही. सर्वच धर्म माणसाने दानधर्माचे पालन करायला हवे असे शिकवतात. दान देण्यासाठी लोकांनी उद्युक्त व्हावे म्हणून सुभाशितकारांनी अनेक सुभाषिते रचलेली पहायला मिळतात.
गौरवं प्राप्यते दानात्, न तु वित्तस्य संचयात्।
स्थितिरुचै: पयोदानां, पयोधीनामध: स्थिति:।।
धन साठवल्याने नव्हे तर दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. जसे पाणी देणाऱ्या ढगांचे स्थान आकाशात उंचावर असते तर परंतु पाणी साठवणाऱ्या समुद्राचे स्थान खाली किंवा खड्ड्यात असते. निसर्ग सुद्धा दान कसे करतो याचे वर्णन करणारेही असेच एक सुभाषित आहे.
दानेन श्लाघ्यतां यान्ति पशुपाषाणपादपा:। एवं
दानमेव गुण: श्लाघ्य: किमन्यै: गुणराशिभि:।।
निसर्गातला प्रत्येक घटक हा सुद्धा आपल्याला काहीतरी देत असतो. पशू, नद्या, वृक्ष हे दान दिल्यानेच प्रशंसेस पात्र होतात. दानासारखे प्रशंसनीय गुण असताना इतर गुणांची काय आवश्यकता? वरील छोट्याछोट्या श्लोकातून दानाचे महत्त्व किती सुंदररित्या वर्णन केले आहे.
हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास “आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे आपदि कर्तव्यो धर्मः। म्हणजे आपदेत अर्थात अडचणीच्या काळात आचरण्याचा धर्म. काही घरगुती अडचणींमुळे, वेळेअभावी इच्छा असूनही आवश्यक त्या धार्मिक कृती करता येत नाहीत. अशा वेळी तिलतर्पण तरी करावे. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी अर्पण करणे.
पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात. हेही ज्यांना शक्य नाही त्या केवळ ताम्हणात उदक सोडावे. अशी हा बहुपयोगी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेली अक्षय्यतृतीया सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, हीच शुभेच्छा.