नवी दिल्ली – चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हेराफेरीचा गुन्हा कबुल केला आहे. या निवडणुकीतून भाजप सत्तेसाठी किती भुकेला आहे तसेच हा पक्ष मतांची चोरी आणि हेराफेरी कसे करतो हे दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने आता सत्ता सोडली पाहिजे असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
भाजप प्रत्येक निवडणूक चोरी आणि घोटाळे करून कसा जिंकत असतो हे भाजप समर्थकांनी समजून घेतले पाहिजे. अशा लोकांच्या हातात ना देश सुरक्षित आहे ना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आहे, असे यादव यांनी एक्सवरील एका हिंदी पोस्टमध्ये म्हटले आहे.
कालच, सुप्रीम कोर्टाने रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांच्या या कृत्यावर जोरदार आक्षेप घेत कडक ताशेरे मारले आहेत. आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणात कायदेशीर आणि घटनात्मक आधारावर, भाजपने संपूर्ण देशाची माफी मागावी आणि सर्वत्र सत्ता सोडावी अशी मागणीही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
उघडपणे लोकशाहीची हत्या करणाऱ्या या लज्जास्पद कृत्याबद्दल भाजप समर्थकांनी प्रायश्चित्त करावे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप चोरी आणि घोटाळ्यांद्वारे प्रत्येक निवडणूक कशी जिंकत आहे हे भाजप समर्थकांना समजले पाहिजे. अशा लोकांच्या हातात ना देश ना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आहे,असे ते पुढे म्हणाले. असे गुन्हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत आणि त्याची त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.