नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये पीपीपी आणि पीएमएल-एन या पक्षांमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा अजूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेली नाही. सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ गटाचे संसदेतील ज्येष्ठ नेते इशाक दर यांच्या निवासस्थानी काल झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समन्वय समितीमध्ये चर्चेची ही पाचवी फेरी होती. निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटून गेला तरी सत्ता स्थापनेबाबतची कोंडी अजून सुटली नाही. ही कोंडी सोडवण्यासाठी ही समिती प्रयत्नशील आहे.
सोमवारी तब्बल ३ तास चर्चा झाल्यानंतर या चर्चेत थोडा वेळ विश्रांती घेऊन रात्री १० वाजता पुन्हा चर्चा सुरू करण्याचे ठरले. रात्री १० वाजता पीएनएल-एन ने ही चर्चा थांबवली आणि पीपीपी बरोबरची ही चर्चा बुधवारी पुन्हा सुरू होईल, असे जाहीर केले.
ही चर्चा सकारात्मक असल्याचे पीएमएल-एनचे नेते आझम नझीर तरार यांनी पत्रकारांशी ओनौपचारिकपणे बोलताना सांगितले. मंत्रिमंडळामध्ये पीपीपीच्या सहभागाच्या काही मुद्यावर निर्णय झाला असल्याचेही तरार यांनी सांगितले.
पीएमएल-एनने आघाडी सरकारचा आग्रह सोडून द्यावा, असा युक्तीवाद पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी करत आहेत. तसे झाल्यास इम्रान खान यांच्या अपक्षांच्या पाठिंब्यावर आणि आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणे त्यांना शक्य होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पीटीआयने सुन्नी इत्तेहाद कौन्सिल या छोट्या पक्षाबरोबर आघाडी केली आहे आणि पीपीपी बरोबर कोणतीही आघाडी करण्याचा प्रस्ताव पीपीपीने यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
देशातील लष्कराने आघाडी सरकार स्थापन करण्याला अनुकूलता दाखवली आहे. मात्र जर पीपीपीने आपल्या अटी शिथील केल्या नाहीत, तर आघाडी सरकार स्थापन होणे अवघड आहे. याच दरम्यान मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (पाकिस्तान) या पक्षानेही पीएमएल-एन ला आपला पाठिंबा दिला आहे.
नवीन सरकारचे पहिले अधिवेशन २९ फेब्रुवारीला सुरू होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षांमध्ये सहमती होइल अशी आशा आहे.