पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या,’ असे म्हणत “पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसयिकांना धार्जिणे असून, त्यांची तातडीने बदली करा,’ अशी मागणी काँग्रसेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केली.
“कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये घेतले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले.
विशाल अगरवाल यांच्या व्यावसायिक कामातही अनियमितता आहे. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून त्यांनी कामे केली आहेत. अगरवाल यांचे मुंबईतील गुंड टोळ्यांशी संबंध आहेत. याबाबतचा तपास थांबलेला आहे. याप्रकरणाची गृह खात्याने कसून चौकशी करावी,’ असे धंगेकर यांनी सांगितले.
“कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस चालढकल करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पबचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. तरुण पिढीला वाचवण्यासाठी पब संस्कृती मुळापासून उखडून टाकण्याचे धाडसी पाऊल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उचलावे. या प्रकरणातील दोषी अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणेने काम केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात जी कलमे लावणे आवश्यक होती, ती लावली नाहीत. तपास अधिकाऱ्यांना निलंबित करायला हवे,’ असे त्यांनी सांगितले.
मुंढवा पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी हप्तेबाज
मुंढवा पोलीस ठाणे तीन कर्मचारी चालवतात. हे तीन पोलीस कर्मचारी पब, हाॅटेलचालकांकडून पैसे घेतात. त्यांची तातडीने चौकशी करून त्यांना निलंबित करा, अन्यथा ४८ तासात हप्तेबाज कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारित करण्यात येईल, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.