पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मिळालेला जामीन आणि एकूण पुण्यातील अपघात प्रकरण यामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी.
यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी,’ अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने करण्यात आली आहे. तसेच हा अपघात घडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्त चाचणीला काही काळ उशीर झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, “या प्रकरणात राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी पुण्यातील पोलिसांवर दबाब टाकण्याचे काम केले आहे. केंद्रातील एका मोठा नेता, तर या निमित्ताने गरीब आणि श्रीमंत अशी दरी तयार करत आहेत. त्यात श्रीमंतांनी गरिबांना गाडीने उडवले, तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत अशी पद्धत विकसित करण्याचे काम केले आहे.
राजा बहादुर मिल परिसरात जे पब चालतात त्याठिकाणी पबचालकांनी आंदोलन केले. ड्रिंक, हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यांच्या परवान्याबाबत कारवाई केली आहे. म्हणून पबवाल्यांनी आज युवकांना सोबत घेउन आंदोलन केले आहे. सदर आंदोलनामध्ये मुलांचा वापर केल्याबाबत या पब चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
मद्य व अमली पदार्थांसाठी अल्पवयीन मुलांना पबचालकांकडून अगोदरच प्रोत्साहित करून गिऱ्हाईक बनवले गेले आहे. त्यामुळेच मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आणि आता पुन्हा पब चालकांवर व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलांचा वापर केला,’ असे मोरे यांचे म्हणणे आहे.