पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गावरान आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून, १५ दिवसांपासून आंब्यांची आवक होत आहे. सध्या रत्नागिरी हापूसची आवक तुरळक झाल्याने खवय्यांच्या नजरा गावरान आंब्यांकडे वळल्या आहेत. त्यामुळे गावरान आंब्यांला चांगली मागणी असून, जुलैपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे.
मार्केट यार्डातील फळबाजारात शुक्रवारी (दि. २४) ९० टन गावरान आंब्यांची आवक झाली. मावळ, मुळशी, भोर तालुक्यांसह खेड, मंचर आणि नगर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. रत्नागिरीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आवक अवघी २०० ते ३०० पेटी होत आहे. कर्नाटक हापूसची चांगली आवक आहे.
मात्र, रत्नागिरीनंतर नागरिक गावरान आंब्यांची आवर्जून वाट पाहात असतात. गावरान आंबा खाऊनच ग्राहक हंगामाचा शेवट करतात. सध्या गावरान हापूसबरोबरच पायरी, केशरची आंब्यांना मागणी आहे. पूर्वमोसमी पावसामुळे मागील आठवड्यात आंबा खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. मात्र, आता पुन्हा मागणीत वाढ झाली आहे. येत्या काळात गावरान आंब्यांची आवक आणखी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मार्केट यार्डात आता गावरान हापूसची आवक वाढल्याने त्याला नागरिकांकडून चांगली मागणी आहे. शुक्रवारी (दि. २४) केशराला किलोला सर्वाधिक ८५ रुपये भाव मिळाला. – युवराज काची, आंब्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड.
आंब्याचा प्रकार आणि कच्च्या आंब्याचे किलोचे भाव
हापूस ४० ते ८० रुपये
पायरी २० ते ५० रुपये
केशर ३० ते ८० रुपये
टीयूव्ही लॅबचे प्रमाणपत्र असलेला सेंद्रीय आंबा बाजारात
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सेंद्रीय खत वापरून तयार केलेला आंबा बाजारात आला आहे. आंबा पिकविण्यासाठी केमिकलयुक्त बुरशी अथवा कीटकनाशकाचा वापर केलेला नाही. १० एकर शेतीमध्ये डॉ. अप्पासाहेब गबाजी नरोडे यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी १४ वर्षांपूर्वी १० एकर शेतीमध्ये आंब्याची बाग लावली आहे.
तेथून दररोज ७० कॅरेट आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. यंदा उष्णतेमुळे बागेची अधिक काळजी घ्यावी लागली. अधिक पाणी द्यावे लागले. येथून निर्माण झालेला आंबा हा सेंद्रीय खत वापरून तयार झाला असल्याचे टीयूव्ही लॅबचे प्रमाणपत्र आहे. याविषयी डॉ. नरोडे म्हणाले, या प्रक्रियेतून चांगला गुणवत्ता असलेला आंबा निर्माण झाला आहे. मी स्वत: डॉक्टर आहे. नागरिकांना विषमुक्त आंबा खाऊ घालण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.