मुंबई – येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला पत्र लिहून केली आहे. याप्रकरणाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती देखील अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा लढा दशकाहून अधिक काळ सुरू आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत आहेत. तसे सबळ वस्तुनिष्ठ माहितीचे पुरावे सादर करण्यात आले. त्यासंदर्भातील सखोल अंतरिम अहवाल महाराष्ट्राने सन 2013 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुपूर्द केला. सन 2014मध्ये याचा अंतिम निर्णय त्यावेळेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अडकला,’ असे अजित पवार म्हणाले.
यापूर्वी तत्कालीन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या शिष्टमंडळाने 21 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. राज्य सरकारने पाठविलेला प्रा. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल योग्य असून तो केंद्राने स्वीकारला आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या संबंधित केंद्राच्या सर्व विभागांनी सकारात्मक अहवाल दिला आहे. तो केंद्र सरकारने स्वीकारला असल्याचे स्पष्ट केले होते. ही संपूर्ण माहिती घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रदिनीच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती.