मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘बॅनर्स’ हा चर्चेचा विषय ठरत असून, राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले बॅनर्स लावण्यात येत आहेत. काहीदिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं.
तर नागपूर येथे आता भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव देखील दाखल झालं आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नाना पटोले असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स समोर आले आहेत.
दरम्यान, उद्या (5 जून) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परिसरात हे बॅनर लावले आहेत. दक्षिण नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे.
सध्या सगळीकडे याच बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा आता होताना दिसत आहे. मात्र, अश्यातच या बॅनरवर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील दोन शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ हवे असते…’ असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला. दरम्यान, या बॅनरवर स्वतः नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “अजून निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे अशा प्रकारचे फलक कार्यकर्त्यांनी लावू नये, असे पटोले म्हणाले आहेत.