तुम्ही आता घाई करू नका
जळोची – 145 चा आकडा जोपर्यंत कोणाकडे येणार नाही. तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मग ते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असोत, तुम्ही आता घाई करू नका. 2024 ला राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. मिटकरी म्हणाले की, भाजप आमदार मोहित कंबोज यांनी 45 नाहीतर 145 आमदार असतील तर मुख्यमंत्री होता येतं. या आशयाचे ट्विट करीत पवार यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, कंबोज यांनी हे ट्विट डिलीटही केले. यावर भाष्य करताना मिटकरी म्हणाले की, प्रश्न असा आहे की, कंबोज यांनी मजकुराचे ट्वीट का केले. पुन्हा ते डिलीट का केले.
हे बरोबर आहे की, 145 ची मॅजिक फिगर असल्याशिवाय मुख्यमंत्रीपद मिळत नाही. 45, 55, 105 असेही संख्याबळ असले तरी मुख्यमंत्री होता येत नाही. असे म्हणत भावनेच्या भरात कंबोज यांनी हे ट्विट केले असावे. ते पुन्हा डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली असावी, असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांच्या बाबत निकालावर भाष्य करताना मिटकरी म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीत निकाल देणे भाग आहे. त्यानुसार निवडणूक आयोग जो निकाल देईल, तो सर्वांना मान्य असेल. राष्ट्रवादीतही शिंदे- ठाकरे यांच्यासारखा पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांनी त्यावेळी केलेले बंड वेगळे आहे. राष्ट्रवादीतील बंड वेगळे आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादीबाबत जो निर्णय देईल, तो सर्वांना मान्य असेल.
तो आकडा लवकरच कळेल
मिटकरी म्हणाले की, शरद पवार गटातील अनेक आमदार, खासदार हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. तसेच नागालॅंडच्या आमदारांनी देखील देवगिरी येथे अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. सध्या सर्व अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारतात म्हणून अनेक आमदार संपर्कात आहेत. तो आकडा लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.