पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज घाटात एका खासगी कंपनीतील कामगाराच्या पिशवीतून चोरट्यांनी २३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. कंपनीत निघालेल्या कामगाराला उन्हामुळे त्रास झाल्याने चक्कर आली. पिशवीत ठेवलेली रोकड चोरून चोरटे पसार झाले.
याबाबत एका उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार उद्योजक बावधन भागात राहायला आहेत. त्यांची पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावात खासगी कंपनी आहे.
कंपनीतील कामासाठी २३ लाख ५० हजारांची रोकड घेऊन कामगार कात्रज घाटातून निघाला होता. घाटातील हाॅलिडे हाॅटेलजवळ वळणावर कामगाराला चक्कर आली, त्याने दुचाकी रस्त्याकडेला लावली.
चक्कर आल्याने कामगार एका झाडाखाली थांबून आराम करत होता. दुचाकीच्या हँडलला त्याने रोकड असलेली पिशवी लावली होती. रोकड असलेली पिशवी चोरून चोरटे तपास झाले. पोलिसांनी कात्रज घाट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपाससाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.