मुंबई – आज अनंत चतुर्दशी असून लाडक्या गणपती बाप्पाला लोक निरोप देणार आहेत. मात्र, या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट असणार आहे. कारण, उद्या हवामान खात्याकडून मुंबई, पुणे व कोल्हापूरसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तसेच, सध्या पडत असणारा पाऊस पुढचे काही दिवस असाच कायम असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बुधवारी कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकले असल्याची माहिती आहे.
यामुळे पुढच्या 72 तासांमध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर बळीराजानेही आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.