मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी भाजपविरुद्ध चकार शब्द त्यांनी काढला नाही. उलट मोदी सरकारचं कौतुक केलं. राज यांनी भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नकल केली होती. त्यानंतर आज अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंना टीका आणि नकलाशिवाय काहीही जमत नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावं की आपल्याला १४ आमदार का सोडून गेले ? केवळ भाषणांनी जणतेची प्रश्न सुटत नाही.
राज ठाकरे पलटी मारण्यात आघाडीवर असून लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी काय केलं आपण पाहिलं. एवढं सरड्यासारखं रंग बदलण्याचा काम राज यांच सुरू असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला.
एकेकाळी पवार साहेबांची मुलाखत घेऊन कौतुक करता. आता अस काय घडलं की, तुम्हाला शरद पवार जातीवादी वाटायला लागले. शरद पवार 1962 पासून राजकारणात आहेत. जेव्हा यांचा जन्मही झाला नव्हता. पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारख आहे. राज ठाकरेंकडून अशी अपेक्षा नव्हती, असही अजित पवार यांनी म्हटलं आहे.