मुंबई – जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बेळगावमधील एका प्रचारसभेनंतर संजय राऊत माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केले होते बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या. आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल, तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे.
तसेच, अजित पवार यांना चांगले माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनले, दुपारी कोसळले, त्यानंतर पुन्हा ते बनले. या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत, असाही टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
दरम्यान, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे, मुख्यमंत्री फार सौम्य आहेत अजूनही मला असे वाटते, मुख्यमंत्री माणुसकी दया दाखवत आहेत, लोकांच्या प्रश्नासंदर्भात ते अस्वस्थ आहेत, पण लोकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी जनतेला केले आहे.