पिंपरी – एखाद्याचा घरीच मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांत करोना बाधितांचा गृहविलगीकरणात मृत्यू झाल्यास त्याचेही शवविच्छेदन केले जाते. मात्र याबाबतची माहिती नातेवाईक शवागृहातील कर्मचाऱ्यांना देत नसल्याचे त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
करोना रुग्णाने गळफास घेतल्यास त्याचे शवविच्छेदन करावे लागते. मात्र इतरवेळी करोना बाधिताचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन केले जाऊ नये, असे आदेश केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना रुग्णालयात जागा न मिळाल्याने घरीच उपचार घ्यावे लागत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सहा करोना बाधितांचा गृह विलगीकरणात मृत्यू झाला. तर काहींचा करोनाचा स्वॅब घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे.
यापैकी अनेक प्रकरणांमध्ये करोना बाधिताचा घरीच करोनामुळे मृत्यू होऊनही डॉक्टर याबाबतचे प्रमाणपत्र देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा करोना बाधितांचे कायद्यानुसार शवविच्छेदनासाठी आणले जाते. मात्र नातेवाईक याबाबतची माहिती लपवून ठेवत असल्याने शवागृहातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे.
एखादा संशयित मृतदेह शवविच्छेदनासाठी आल्यास कर्मचारी पीपीई कीट घालून शवविच्छेदन करतात. मात्र आठ तास पीपीई कीट घालून शवविच्छेदन करणे त्यांना शक्य होत नाही. आम्ही देखील माणूस आहोत, आम्हालाही कुटूंब आहे. त्यामुळे नागरिकांनी मृतदेहाबाबतची योग्य ती माहिती आम्हाला द्यावी, अशी कळकळीची विनंती हे कर्मचारी करीत आहेत.