मुंबई – अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाला येड पांघरूण पेडगावला जायचं होतं की त्यांचा अभ्यास कमी होता, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पावार यांनी “सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे,’ या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. राज्य अडचणीत असताना राज्याला कर्जातून बाहेर काढत असताना महसूली तुट कशी कमी करता येईल व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकार आणण्याचा प्रयत्न करताय ठिक आहे. परंतु ठराविकांना जास्त पैसे दिले असं बोलून काय होणार आहे का? असा टोलाही अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
द काश्मीर फाईल’ सिनेमाला करमुक्त करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. यावर बोलताना अजित पवार यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल’ सिनेमाचा उल्लेख केला. त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच लागू होईल. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी सभात्याग केला.
आमदारांचा स्थानिक विकास निधी 1 कोटींनी वाढवला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांना 5 कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला 20 हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला 30 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देतानाच शेतकऱ्यांच्या बाजूने महाविकास आघाडी सरकार नाही या आरोपांचे खंडन करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची आकडेवारी सभागृहात मांडली.