Anil Deshmukh – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) यांच्यावर टीका केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यासपीठ सोडून जायला हवं होतं किंवा मोदींना अधिक माहिती द्यायला हवी होती. त्यामुळे मोदींनी वक्तव्यात दुरूस्ती केली असती, असे म्हणत माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
मोदींनी गुरूवारी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यावेळी शिर्डीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले गेले. राज्यातील एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषिमंत्री होते. पण, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल मोदींनी केला.
त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. त्याचा संदर्भ घेऊन देशमुख यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल याआधी मोदींनी शरद पवार यांची प्रशंसा केली होती. आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भूमिका बदलली, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.
एवढेच नव्हे तर, मोदींनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीचा भागही देशमुख यांनी वाचून दाखवला. शरद पवार यांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार करून उचलले गेलेले असते, असे मोदींनी त्या मुलाखतीत म्हटले होते.