बारामती, (प्रतिनिधी)- भारत देशांमध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कदापिही कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलले जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती नगर परिषद व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील १०६ सदनिकेचा लोकपर्ण सोहळा पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व आयोजक माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, माजी नगरसेवक किरण गुजर, मयुरी शिंदे, अनिता जगताप, नवनाथ बल्लाळ, अभिजित चव्हाण, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे तांत्रिक संचालक अनिल कानीटकर, प्रशासन संचालक प्रवीण कोळी, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, संविधान बदलले जाणार, असा अपप्रचार विरोधक मुद्दाम करीत आहेत. त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. भावनिक होऊ नका. आयोजक नगरसेवक बिरजू मांढरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर वसाहतमध्ये गोरगरिबांचे हक्काचे अत्याधुनिक स्वतःचे घर पूर्ण करून त्यामध्ये राहण्याचा हक्क फक्त अजित पवार यांनी दिला आहे.
त्यामुळे आजचा हा एतेहसिक दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. शासकीय योजना तळागाळात आणण्याचे श्रेय फक्त अजित पवार यांना जाते जनता हे उपकार विसरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या इमारतीचे स्मृतीचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पाच रहिवाशांना सदनिकाच्या चाव्या अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आल्या. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले.