1978 मधील शरद पवार यांच्या राजकीय खेळीला उजाळा
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक घडामोडी घडत आहेत. काहीशी अशीच घटना महाराष्ट्रात 1978मध्ये घडली होती. 1978 मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून बाहेर पडत “पुरोगामी लोकशाही दला’चे म्हणजेच “पुलोद’चे सरकार स्थापन केले होते. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका पुढे अनेक वर्षे होत राहिली. याचीच आठवण अद्यापही शरद पवार यांना असेल असा अंदाज असून शरद पवार यांचाच कित्ता त्यांचे पुतणे अजित पवार यांनी गिरवल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार यांनी त्यावेळी “पुलोद’स्थापन केले होते; मात्र अजित पवार यांनी आज योग्यवेळी आपली भूमिका जाहीर करणार असे सांगून राजकारणातील सस्पेन्स कायम जरी ठेवला असला तरी काकांचा कित्ता पुतण्या गिरवणार का? याबाबत राजकवर्तुळात दिवसभर चर्चा झडत आहेत.
राज्यात एकीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या “महाविकासआघाडी’च्या बैठकांवर बैठका सुरू असताना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर सहमतीचे संकेत दिसत असतानाच, आज (शनिवारी) सकाळी जनता झोपेतून उठण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदी मी पुन्हा येईन म्हणारे देवेंद्र फडवणीस यांनी राजभवनात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची तर धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सगळ्यांचाचा यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर दिवसभर अनेक राजकीय घडामोड घडल्याने शनिवारी राज्याच्या राजकारणाने वळण घेतले.
शरद पवार यांनी 1978मध्ये “पुलोद’ची स्थापना करून त्यांनी राज्यातले पहिलं आघाडी सरकार स्थापन केले होते. आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे सरकार पाडून वयाच्या 38 व्या ते मुख्यमंत्री खुर्चीवर विराजमान झाले होते. मात्र, त्यावेळीही अनेक नाट्यमय घडामोडीनंतर ते मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. काही जणांच्या मते शरद पवारांनी अगदी तरुण वयात सरकार स्थापन करून आपल्या राजकीय चातुर्याची ओळख राज्याला करून दिली होती, अशीही चर्चा त्यावेळी होती. मात्र, आताची आणि 1978मधील राजकीय परिस्थितीमध्ये जमीनाअसमानचा फरक असल्याने आता अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
“संजय’उवाच…
अजित पवार यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर “पुलोद’ सरकारच्या घटनेची आठवण काढली जात आहे. तर नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, की, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असे खळबळजनक व्यक्तव्य करून शरद पवार यांच्या “पुलोद’ची जनतेला आठवण करून दिल्याने, “संजय’ उवाच आणखी किती दिवस चालणार की आता या घटनेनंतर बंद होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.