मुंबई – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत मुंबईकडून खेळताना अजिंक्य रहाणेने दमदार शतकी खेली केली. त्याच्या या खेळीमुळे त्याच्यावरच्या टीका थांबणार असून येत्या काळात भारतात होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होण्याचेही संकेत मिळत आहेत.
निवड समिती तसेच बीसीसीआयने रहाणेला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. तो मान्य करत रहाणे त्याच्यापेक्षा खूप ज्युनिअर असलेल्या पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघातून रणजी स्पर्धेत खेळत आहे. रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचे असून त्याच्यावर असलेला दबाव दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या वर्षी मोसमाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. भारताच्या कसोटी संघातून त्याला बाहेर करण्याची मागणीही होत होती. त्याच परिस्थितीत रहाणेने शतक फटकावत टीकाकारांना चांगले प्रत्युत्तर दिले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने सहा डावात अवघ्या 136 धावा केल्या होत्या. भारताने ही मालिका 2-1 अशी गमावली होती. आता रहाणे भरात आल्यावर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.