कोलकाता – विराट कोहलीशी माझे काहीही बिनसलेले नाही, असे वक्तव्य केलेल्या रोहित शर्मानेच भर मैदानावर आपली निराशा व्यक्त केली. त्याचा आणि कोहलीचा पहिल्या टी-20 लढतीत उडालेला खटका सर्वांनीच पाहिला.
पहिला टी-20 सामना सुरू असताना पंचांनी दिलेल्या एका निर्णयावरून कोहलीने रोहितबरोबर वाद घातल्याचे पाहायला मिळाले. रवी बिष्णोई गोलंदाजी करत असताना रोहितने डीआरएस घेण्यासाठी कोहलीसह अन्य काही खेळाडूंची मते विचारली. त्याचवेळी कोहलीने दिलेल्या सल्ला मानून रोहितने डीआरएस घेतला. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नव्हे तर पॅडला लागला आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेल्याचे स्पष्ट दिसले व परिणामी पंचांनी त्याला नाबाद ठरवले.
यामुळे संतप्त झालेल्या रोहितने कोहलीलाही काही शब्द सुनावले व कोहलीनेही त्याला प्रत्युत्तर दिले. ही घटना कॅमेरात कैद झाली व या दोन खेळाडूंमध्ये निश्चितच काहीतरी बिनसलेले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रोहितचा इशारा
पहिला सामना जिंकल्यावरही रोहित शर्माने पत्रकार परिषदेत थेट नाव न घेता कोहलीसह पंतलाही इशारा दिला आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली अन्यथा सामना आणखी लवकर जिंकला असता. येत्या काळात प्रमुख फलंदाजांकडून जबाबदारीने फलंदाजी व्हावी अशी अपेक्षा आहे, असे रोहित म्हणाला होता. यातूनच त्याने या दोन खेळाडूंना संघातील तुमचे स्थान डळमळीत होऊ शकते, असा इशारा दिला आहे.