संगमनेर -उत्तर नगर जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून, या भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे व उजव्या कालव्याची कामेही त्वरित पूर्ण करावी, यासाठी निळवंडे कृती समितीनेही 13 सप्टेंबरला आंदोलन करण्यात आले होते. आ. थोरात व जनतेच्या रेटा यापुढे सरकार झुकले असून, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांसाठी आ. थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे अगदी करोनाच्या संकटातही रात्रंदिवस काम करून पूर्ण केली आहेत. मे महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे दहा टीएमसी पाणी असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी आ. थोरात यांनी केली होती. या नंतर डाव्या कालव्याला पाणी सोडले होते.
यंदा उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत.
पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळाची छाया, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, रोजगार हमीच्या कामांचा प्रश्न असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. मात्र, या सर्व प्रश्नांबाबत सरकार उदासीन असून, या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आ. थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारकडे केली आहे. डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोले तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांनी कालव्यांच्या कामासाठी कायम मोठे सहकार्य केले आहे. त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. उजव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून चाचणी घेऊन सर्व गावांनाही त्वरित पाणी द्यावे.
आ. बाळासाहेब थोरात