कोपरगाव, दि. 14 (प्रतिनिधी) -नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर पाण्याची नासाडी होणारच आहे परंतु भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आजवर झालेला अन्याय यापुढे होणार नाही, यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नगर, नाशिक जिल्ह्यातील आमदारांची मोट बांधण्यात पुढाकार घेतला आहे.
नगर-नाशिकच्या धरणातून समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या विचाराधीन आहे. त्याबाबत दि.17 रोजी समन्यायी पाणी वाटप समितीची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आ.बाळासाहेब थोरात,आ. शंकरराव गडाख, आ. प्राजक्त तनपुरे, आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप बनकर, आ. लहू कानडे आदी नेत्यांसोबत जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन चर्चा करावी व त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा, याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे.
..तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये
कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 2014 च्या आदेशाची अंमलबजावणी करू नये व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेरनिर्णय येत नाही, तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री फडणवीस यांच्याकडे केली.