शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. नर्गिस यांच्या कारकिर्दीचा इतिहास मोठा उद्बोधक आहे. आतापर्यंत त्यांना कितीतरी खटल्यांना सामोरे जावे लागले आहे. कितीतरी शिक्षा भोगाव्या लागल्या आहेत. त्यांचे जीवन त्यामुळे संकटमय आणि कंटकमय राहिले आहे. स्वातंत्र्य आणि समानतेचा आग्रह यासाठी त्यांनी सर्वस्वाचे समर्पण केले. त्यांच्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू स्त्रियांना न्याय मिळवून देणे व त्यांना मानवी हक्क प्राप्त करून देणे हाच म्हटला पाहिजे. त्यामुळेच नॉर्वेजियन नोबेल पुरस्कार समितीने घेतलेला हा निर्णय मानवी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, लोकशाहीच्या मूल्यस्थापनेसाठी महत्त्वाचा वाटतो.
शांतता आणि विकास हा नव्या जगाचा शोध आहे. 1902 पासून शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणमधील ध्येयवादी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सबंध जगाचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वेधले गेले आहे. खरे तर पुरस्कार आणि तिरस्कार या दोन्ही बाबी तशा पेचात टाकणाऱ्या असतात. जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा लोक डोक्यावर घेतात आणि जेव्हा तो नसतो त्यावेळी कधी कधी लोक त्या कार्याचा तिरस्कार करतात आणि छळही करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नर्गिस मोहम्मदी. त्या स्वत: अभियंता आहेत. त्यांनी सिटी ऑफ काजविन विद्यापीठातून पदार्थ विज्ञानाची पदवी घेतली आहे. आपले कार्य करत करत त्यांनी पत्रकारितेलासुद्धा वाहून घेतले. वृत्तपत्रांमध्ये महिलांच्या प्रश्नांवर त्या मुक्त स्तंभलेखन करू लागल्या. इराणसारख्या धर्मप्रधान देशात महिलांची होणारी कोंडी आणि त्यांचा होणारा छळ याच्या एकापेक्षा एक करुण कथा त्यांनी प्रकाशामध्ये आणल्या. याबरोबरच आंदोलनातील त्यांचा सहभागही वाढत गेला.
नर्गिस यांच्या कारकिर्दीचा इतिहास मोठा उद्बोधक आहे. आतापर्यंत त्यांना कितीतरी खटल्यांना सामोरे जावे लागले आहे. कितीतरी शिक्षा भोगाव्या लागल्या आहेत. त्यांचे जीवन त्यामुळे संकटमय आणि कंटकमय राहिले आहे. स्वातंत्र्य आणि समानतेचा आग्रह यासाठी त्यांनी सर्वस्वाचे समर्पण केले. त्यांच्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू स्त्रियांना न्याय मिळवून देणे व त्यांना मानवी हक्क प्राप्त करून देणे हाच म्हटला पाहिजे. स्त्रियांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण यावेत, त्यांना मानवीवृत्तीचा, न्यायाचा अनुभव मिळावा म्हणून त्यांनी केलेले कार्य खरोखरीच इतिहासाला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा घेतला तर असे म्हणता येईल की, आजवर त्यांच्या विरुद्ध 51 पेक्षा अधिक खटले चालले आहेत. त्यामध्ये त्यांना13 वेळा शिक्षाही झाली. पण तरीही त्या डगमगल्या नाहीत. तसूभरही हलल्या नाहीत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा संघर्षमय आहे आणि तो संघर्षाला सामोरे जाण्यातच खरे बाणेदार जीवन आहे, हे त्यांनी अनुभवले आणि कृतीमध्ये आणले. त्यांच्या कार्याचे हे वेगळेपण विशेष आहे.
नर्गिस यांना नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीने जो अहवाल दिला आहे आणि त्यांची यथार्थता मांडली आहे ती सनद खूप महत्त्वाची वाटते. जागतिक शांतता पुरस्कारासाठी त्यांच्या निवडीची कारणे देत असताना प्रामुख्याने तीन गोष्टींवर भर दिला आहे. पहिले म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेला निरंतर धैर्यशील लढा. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष तुरुंगात असतानाही त्यांनी चालवलेल्या चळवळी. तिसरे म्हणजे आपले कुटुंब, परिजन आणि समाजजीवन या सर्वांना सांभाळत त्यांनी हा संघर्ष केला. आठ वर्षांपासून त्यांची आणि कुटुंबाची भेट झालेली नाही. पतिराजांची भेट नाही. मुलांचीही भेट नाही.
अंधारात जीवन जगत असतानासुद्धा त्यांनी मूल्यांवर अढळ विश्वास ठेवला आणि हा संघर्षाचा यज्ञ चालवला. असे करण्यात त्यांचा ध्येयवाद हा खरोखर महत्त्वाचा ठरला आहे. सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये स्त्रीला समानता मिळावी, मानवी हक्काची वागणूक मिळावी हे तसे पाहिले तर वैश्विक मूल्य आहे. परंतु धर्मप्रधान देशामध्ये मानवी मूल्यांची किती हेळसांड होते याचे इराण हे उत्तम उदाहरण आहे. तेथे 2022 पासून एका वर्षांत 960 जणांना फाशीवर देण्यात आले. नर्गिस यांनी तुरुंगात राहून फाशीच्या विरुद्ध असलेली चळवळ सुद्धा चालवली. स्त्रियांचे हक्क असोत, फाशीविरोधातील कायदा असो किंवा स्त्री-पुरुष विषमता असो या सर्व बाबतीत त्यांनी केलेला संघर्ष हा खरोखर विलक्षण रोमांचकारी असाच म्हटला पाहिजे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचे खरे वेगळेपण भविष्यात इतिहास जेव्हा नव्याने लिहिला जाईल तेव्हा ते मान्य होईल.
1990 च्या दशकामध्ये भौतिकशास्त्राच्या विद्यार्थिनी म्हणून त्यांनी जीवनाला प्रारंभ केला. परंतु भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना वास्तव मात्र वेगळेच जाणवले. ते वास्तव होते स्त्री पुरूष समानतेचे. ज्ञानविज्ञानाला न्याय हक्काची जोड देवून महिलांच्या कल्याणासाठी स्वत:ला झोकून देवून सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या या महिलेने खरोखर आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या देशाच्या पुनरुत्थानासाठी व स्त्रियांच्या मुक्तीसाठी केलेले कार्य तसेच अभियंता म्हणून सामाजिक अभियंत्रिकेच्या केलेल्या चळवळी या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. वृत्तपत्रामध्ये त्यांनी केलेले लिखाण खूपच दर्जेदार होते. न्यूयार्क टाइम्समधील त्यांचे स्तंभलेखन त्यांनी तिथपर्यंत कसे पोहचवले याचीही मोठी करुण कहाणी आहे. तुरुंगात असतानासुद्धा जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या न्यूयार्क टाइम्स या वृत्तपत्रात त्या स्तंभलेखन करतात ही गोष्ट त्यांच्या कर्तृत्वाची आणखी एक ओळख म्हटली पाहिजे.
नोबेल पारितोषिक विजेत्या नर्गिस या शिरीन एबाबी यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या वैश्विक महिला केंद्राचे कामही गेल्या काही वर्षांपासून करत होत्या. हे कार्य ही नवे वळण देणारे होते. नर्गीस यांच्या आयुष्यात अटक, तुरुंगवास आणि शिक्षा हे न संपणारे होते. पण कोणत्याही संकटाशी सामना करताना त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पहिल्यांदा दोन वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. परंतु फाशीच्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी केलेल्या चळवळीमुळे पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. स्वत: झोकून देऊन आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य खरोखरच अतुलनीय आहे. समाजजीवनात स्त्रीयांना सन्मानाचे स्थान मिळावे ही त्यांची भूमिका न्याय्य आहे.
तुरुंगात स्त्रियांवर होणारा लैगिंक हिंसाचार रोखण्यासाठी त्यांनी तेथील अमानुष प्रथा आणि परंपरेवर जबरदस्त प्रहार केले आहेत. तेहराणमधील कुख्यात इव्हिन तुरुंगातील अत्याचाराचे त्यांनी वाभाडे काढले आणि ते जगाच्या वेशीवर मांडले. स्त्रियांच्या प्रश्नांचे नेतृत्व करताना कुठेही त्यांनी अहंकार जोपासलेला नाही किंवा आपण म्हणतो तेच खरे आहे असा आग्रहही धरलेला नाही. त्यांची भूमिका न्याय्य, समतोल आणि तेवढीच विवेकी राहिली. त्यामुळे त्यांनी केलेल्या चळवळी, त्यांनी आखलेल्या मोहिमा आणि त्यांची आंदोलने याला मानवाधिकाराचे श्रेष्ठ कोंदण लाभले आहे. म्हणून त्यांची नोबेलसाठी निवड करताना मानवाधिकार, लोकशाहीवाद आणि स्वातंत्र्याची लढाई, स्त्रियांच्या कल्याणाचे लढे यावर आधारित त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीने घेतलेला हा निर्णय मानवी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, लोकशाहीच्या मूल्यस्थापनेसाठी महत्त्वाचा वाटतो. भविष्यकाळात लाखो लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत, स्त्रियांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी त्यांनी केलेले कार्य हे सदैव लोकांच्या स्मरणात राहिल यात शंका नाही.