राहाता -ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे महायुती सरकारच्या कामावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयाने सुरू असलेल्या विकासात्मक कामाला मतदारांनी साथ दिल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींमध्ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये आणि श्रीरामपूर तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ “शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून पोहोचविण्याचे काम निरंतरपणे सुरू आहे.
समाजातील सर्व घटकांशी या उपक्रमातून होत असलेला सुसंवाद याचे यश या निवडणुकीत दिसून आले आहे. भाजपच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा कार्यकर्त्यांकडून होत असतो. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयाचा योग्य परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झाला असून, तालुक्यातील विकासाला कधीही निधी कमी पडू दिला नाही. विकासाची प्रक्रिया आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी होत आहे.