पारनेर – नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी पुकारलेल्या गाव बंद आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी उपस्थित राहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी गावातील अपघातांची चाललेली मालिका, शालेय विद्यार्थ्यांचा, ग्रामस्थांचा निर्माण झालेला दळणवळणाचा अत्यंत गंभीर प्रश्न मांडला. ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते परंतु पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक लावून देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, १५ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिला.
उपविभागीय अधिकारी संजय भावसार यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे मोठे स्पीडब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, सोलर रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते थांबवले. पोलिस निरीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आंदोलनकर्ते व ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीत भूमिअभिलेख कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव देण्याचे जाहीर केले. दोन दिवसांत भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक १६ तारखेला घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिरंगाई होऊ देऊ नका ग्रामस्थांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे पुन्हा फसवणूक केल्यास पुन्हा भुतो न भविष्यती असा रास्ता रोको आंदोलन झालेले पाहायला मिळेल, असेही सांगितले.
आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सरपंच मनिषा जाधव, उपसरपंच राजेंद्र शळके, तान्हाजी पवळे, माजी चेअरमन बाळासाहेब चव्हाण, सुनिल भंडारी, ग्रा.पं.सदस्य विनायक शेळके, ग्रा.पं.सदस्य काशिनाथ नवले, माजी सैनिक काशिनाथ नवले, बाळासाहेब जगताप, गणेश कोहकडे, धनंजय नाईक, संपत शेळके, उद्योजक प्रकाश चव्हाण, ग्रा.पं. सदस्य सूरज खरात, शाखाप्रमुख हुसेन शेख, प्रदिप जाधव, दिलीप शेळके, नारायण खोले, विठ्ठल कांडेकर, भाऊसाहेब शेळके, काशिनाथ कांडेकर, राजू शेळके,
हौशिराम कुदळे, शिवाजी भोसले,गणेश नवले, रमेश कोहकडे, सुदाम शेळके, मंगेश शेळके, अक्षय कांडेकर, अक्षय शेळके, चैतन्य खोले, गणेश भोसले, संदीन कांडेकर, संतोष कोहकडे, राजु शेख, रमेश कोहकडे, शंकर हारदे, बाळासाहेब शेळके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी नारायणगव्हाण चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवून ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगितले.