खेड – खेड (ता.कर्जत) येथील आगवणवस्ती शिवारात नुकत्याच जन्म झालेल्या नवजात बालिकेचा उसाच्या शेतात मृत अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खेड परिसरात खळबळ उडाली आहे. स्रियांच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच या नवजात बालिकेला हे जग पाहण्या अगोदरच या जगाचा निरोप घ्यायला भाग पाडले आहे. ‘माते तू वैरीण’ या म्हणीची प्रचितीच या घटनेने आली आहे.
‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली असली, तरी समाज व्यवस्थेच्या बुरसटलेल्या रचनेत आजही मुलींचा बळी घेतला जात असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. पालकांना मुलींचे ओझे होऊ नये यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या असल्या तरी ‘नकोशा’ असणाऱ्या मुलींचे पोटातच बळी घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या बालिकेच्या नाका -तोंडातून रक्त आले असल्याने तिचा खून करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. जन्मल्यानंतर या नकोशीची नाळही तोडण्याची दानत तिच्या मातेने दाखवली नाही. नाळेसह खून केलेली नकोशी युरियाच्या गोणीत माजी सरपंच लक्ष्मण कांबळे यांच्या उसाच्या शेतात टाकून दिली होती.
ही नकोशी अनैतिक संबंधातून जन्माला आली असावी. उसाची घनदाट शेती, जिल्ह्याची सीमा रेषा आदींचा फायदा घेऊन तिला येथे टाकण्यात आले असावे, असे दिसते. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी नगर येथे पाठवल आहे. कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.